वार्षिक कार्यक्रम

Home / वार्षिक कार्यक्रम

महिन्याप्रमाणे वार्षिक कार्यक्रम

चैत्र महिना

चैत्र शुद्ध प्रतिपदा (गुढीपाडवा)
सकाळच्या ०७ च्या आरती नंतर विधीवत पुजा करून गुढी उभी केली जाते. 
गुरुजींकडून पंचांग पूजन व वाचन केले जाते. गाभारा दिवसभर दर्शनासाठी खुला ठेवण्यात येतो.
 
चैत्र शुद्ध ०२ श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकटदिन  
सकाळी स्वामी महाराजांना उपस्थित विश्वस्त व गुरुजींच्या हस्ते  विधिवत षोडषोपचारी पुजा करण्यात येते. स्वामी महाराजांना बेसनाच्या लाडवाचा नैवेद्य दाखवण्यात येतो. गाभारा दुपारी ०१ ते ०३:३० बंद राहतो.
 
चैत्र शुद्ध १५ (हनुमान जयंती) 
आदल्या दिवशी मारुतीस खोबरं व तेल जाळून त्याच काळ मांजण लावलं जाते. पहाटे मारुती मंदिरा मध्ये श्री मारूतीस उपस्थित विश्वस्त व गुरुजींच्या हस्ते  विधिवत षोडषोपचारी पुजा करण्यात येते, स्नानानंतर मारूतीस पांढरे कापड नेसवून लाल दोऱ्यात लवंगाची माळ घातली जाते. सूर्योदय समयी श्री मारूती जन्म काळ साजरा करण्यात येतो तसेच मारूतीस कलिंगड व टरबूज आदींचा नैवेद्य होतो.  तसेच श्रीं च्या समाधी सोहोळ्याच्या कार्यक्रम पत्रिकेचे पूजन व वाचन करून पत्रिका देवापुढे ठेवली जाते व गाभारा  दिवसभर दर्शनासाठी खुला ठेवण्यात येतो.
उत्सवाच्या कार्यक्रम पत्रिकेचे वाचन झाल्यानंतर त्याचे आमंत्रण श्री स्वामी समर्थ मंदिर अक्कलकोटला ट्रस्टी घेऊन जातात व येताना अक्कलकोट मंदिरातील विहिरीचे पाणी उत्सवातील श्रीं च्या अभिषेकासाठी घेऊन येतात.
 
चैत्र कृ :१३ त्रयोदशी श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी
सकाळी स्वामी महाराजांना उपस्थित विश्वस्त व गुरुजींच्या हस्ते  विधिवत षोडषोपचारी पुजा करण्यात येते. स्वामी महाराजांना बेसनाच्या लाडवाचा नैवेद्य दाखवण्यात येतो.  गाभारा दुपारी ०१ ते ०३:३० बंद राहतो . 

वैशाख महिना

वैशाख शुद्ध प्रतिपदा ते वैशाख शुद्ध नवमी पर्यंत श्रींचा समाधी सोहळा संपन्न होतो.
महाराजांचा समाधी सोहळा दरवर्षी अधिक दिमाखदार व वैभवशाली करण्याचा विश्वस्तांचा प्रयत्न असतो. उत्सव काळात मठ संपूर्ण २४ तास श्रींच्या दर्शनाकरिता खुला असतो. श्रींच्या समाधी उत्सवा आधीची कामे “उत्सवातील कामे” या लिस्ट प्रमाणे सेवेकरी व विश्वस्तां मार्फत केली जातात तसेच गाभारा, सभामंडप व इतर इमारतींना रंग रंगोटी केली जाते. फुलांची सजावट व रोषणाई केली जाते. श्रींच्या समाधी उत्सवात भक्तीसंगीत महोत्सव तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. श्रींच्या समाधी उत्सवात ७ दिवस संध्याकाळी आरती नंतर वेगवेगळ्या प्रकारचे प्रसाद ट्रस्ट व सेवेकऱ्यांमार्फत भक्तांना दिले जातात. 
 
वैशाख शुद्ध प्रतिपदा
या दिवशी पहाटे ०४ वाजता श्रींचे मंगलस्नानास आरंभ होतो.  श्रींचा पोशाख व नैवेद्या नंतर कलश पूजन व वीणा पूजन करून उत्सवास प्रारंभ होतो.  सूर्योदयापासून अखंड सप्ताह वीणा उभी केली जाते व “गुरू महाराज गुरु जय जय परब्रम्ह सद्गुरू” असा जप केला जातो.
 
वैशाख शुद्ध ०३ अक्षय तृतीया
या दिवशी सकाळी सर्व उपचार संपन्न होऊन गजानन विजय ग्रंथाचे पारायण संपन्न होते व पिठले भाकरीचा नैवेद्य व प्रसाद सर्व भक्तांना देण्यात येतो. श्री शिवाजी महाराज विडणी यांच्या पुण्यतिथी निमित्त ११ लहान मुलांना भजी व दक्षिणा दिली जाते.
सायंकाळी आरती नंतर अन्नपूर्णा पुजा संपन्न होऊन, महाप्रसादाच्या बुंदीचा पहिला घाणा काढून अन्नपूर्णा व बुंदीची पूजा केली जाते. या दिवसा पासून प्रसादाची बुंदी तयार करण्यास सुरूवात होते व हि बुंदी प्रसाद म्हणून वैशाख शुद्ध अष्टमीला दिवसभर महाप्रसादासाठी व संध्याकाळी पालखी नंतर वाटली जाते. 
 
वैशाख शुद्ध अष्टमी (महाष्टमी)
पहाटे २ च्या सुमारास श्रींच्या अभिषेकास प्रारंभ होतो व सर्व पूजा विधी झाल्यावर नवीन आसूड (चाबूक) व समाधी वरील छडी ची पूजा करण्यात येते. आसूड शेजघरामध्ये ठेऊन व छडी समाधीवर  ठेऊन हि पूजा संपन्न होऊन पहाटे ५:०० वा महारती होते. 
 
आरती नंतर महारुद्राभिषेक श्रींच्या पालखीतील पादुकांवर केला जातो. महाराजांना पुरणपोळी व विविध प्रकारची मिठाई यांचा नैवेद्य दाखवला जातो. त्यांनतर आरती, ब्राम्हण भोजन व महाप्रसाद सुरु केले जाते. सर्व ब्रम्हवृंदाना दक्षिणा व बुंदीचा प्रसाद देण्यात येतो.  दुपारी ०४ ते ०६:४० पालखी सोहळा संपन्न होतो. ०६.४५ वाजता आरती होऊन रात्री १०:०० ते ११.३० पर्यंत देवीच्या गोंधळाचा कार्यक्रम हॊतॊ. त्यानंतर पहाटे पर्यंत भजन सेवा संपन्न होते. 
 
वैशाख शु ०९ सप्ताह समाप्ती काला :
या दिवशी श्रींना अभिषेका पूर्वी सुगंधी तेलाचे लेपन केले जाते. तदनंतर श्रींना गरम पाण्याने अभिषेक केला जातो. या दिवशी श्रींच्या अभिषेका मध्ये दुधाचा अभिषेक केला जात नाही.  तसेच पोशाखा नंतर श्रीनां चहा ऐवजी केशर दुधाचा नैवेद्य अर्पण केला जातो व सकाळची आरती संपन्न होते. 
 
ध्वजारोहण सोहळा (नवीन ध्वज) सकाळी १०.३० ते ११.३० या दरम्यान संपन्न केला जातो.
मुख्य ध्वजस्तंभ, गाभारा, स्वामी मंदिर, मारुती मंदिर व दत्त मंदिर वरील ध्वज बदलले जातात. ९:०० ते १२:०० या वेळेत काल्याच्या कीर्तनाचा कार्यक्रम ह.भ.प. लेंभे शास्त्री (पिंपोंडे बु., कोरेगाव, सातारा) यांच्या तर्फे गुरूपरंपरागत रितीने होतो व कीर्तनानंतर हंडी फोडली जाते. दुपारच्या आरती नंतर काल्याच्या कीर्तनाचा प्रसाद व महाप्रसाद वाटप केले जाते. ध्वज उचलल्या नंतर थोड्याच वेळात भाविकांसाठी दर्शन बंद करून सभामंडपातून दुपारची आरती केली जाते.
आरती नंतर श्रींची प्रक्षाळ पुजा (देवाला विश्रांती व शीण घालवणे यासाठीची पूजा) होऊन श्रीना चहा सिगारेट चा नैवेद्य दाखवून गाभारा बंद केला जातो संपूर्ण परिसर धुवून झाल्यावर साधारण ४:०० ते ५:०० या वेळात शांतीपाठ केला जातो व त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ०४:३० पर्यंत मठ बंद राहतो. सर्व सेवेकऱ्यांना श्रीफळ व बुंदीच्या प्रसादाचे वाटप केले जाते.

वैशाख शुद्ध द्वादशीला अखिल भारतीय वारकरी मंडळा मार्फत चंदन उटीची भजनं करण्यात येतात. श्रींना व पादुकांना  त्यादिवशी चंदन उटी लेप लावण्यात येतो व त्यानंतर महाप्रसाद वाटण्यात येतो.

जेष्ठ महिना

जेष्ठ महिन्यात नामसप्ताह, अष्टमी नेहेमीप्रमाणे पालखी सोहळा,  महाप्रसाद संपन्न होतो.
जेष्ठ पौर्णिमा या दिवशी मठात महिला वर्ग बहुसंख्येने वट-पूजन करण्यासाठी उपस्थित राहतात. विहिरी जवळील वडाच्या झाडा पाशी वट पूजन संपन्न होते.
जेष्ठ दशमीस संतश्रेष्ठ श्री कान्हुरज महाराज पाठक यांच्या पालखी व दिंडीचे आगमन होते. दशमीस मुक्काम करून दुसऱ्या दिवशी एकादशीस पहाटे श्रींच्या अभिषेका सोबत कान्हुरज महाराजांच्या पादुकांना अभिषेक करण्यात येतो. तसेच दशमीला दिंडीतील वारकऱ्यांकरिता जेवण व एकादशीला फराळ करून सकाळी ९ च्या सुमारास दिंडी पुढील प्रवासासाठी मार्गस्थ होते. निघताना ट्रस्ट तर्फे धान्य शिधा दिंडीला दिला जातो.

आषाढ महिना

आषाढ महिन्यात अष्टमी नेहेमीप्रमाणे नामसप्ताह ,पालखी सोहळा, महाप्रसाद संपन्न होतो.
पंचांग पाहून सप्तमी किंवा अष्टमी पासून गुरुचरित्र पारायण सप्ताहास प्रारंभ होतो. सप्तमी ते चतुर्दशी असा ७ दिवसाचा पारायण सप्ताह होतो. या मध्ये पुरुष गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण करतात तसेच महिला शंकर गीता, गजानन विजय इत्यादी ग्रंथाचे पारायण करतात. आषाढ वद्य ०१ म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी आरती व शिऱ्याच्या प्रसादाने पारायणाची सांगता होते.
 
गुरुपौर्णिमा
या दिवशी ट्रस्ट तर्फे पहाटे श्रींची विधिवत महापूजा होऊन त्रिकाळ आरती व प्रसाद संपन्न होतो. तसेच ग्रहण असल्यास पंचांगा मध्ये पाहून पालखी आदी कार्यक्रमांचे नियोजन केले जाते. साधारण सकाळी १० ते १२:४० यावेळेत मठामध्येच तीन प्रदक्षिणा होत पालखी सोहळा संपन्न होतो व नंतर द्रोणामध्ये साबुदाणा खिचडीचे वाटप केले जाते. गुरुपौर्णिमेला सुहासिनीं कडून श्रींची मीठ व मोहरीने श्रींची दृष्ट काढण्यात येते.
आषाढी एकादशीला विठ्ठल व ज्ञानेश्वर माऊली यांचे फोटोची पूजा केली जाते.
 
 आषाढ कु.१५ – दिव्यांची आवास सायंकाळच्या आरती नंतर गाभाऱ्यात दिव्यांची पुजा केली जाते. आघाडा, बेल, तुलस,वस्त्र माळ इत्यादींचा समावेश त्यामध्ये असतो.

श्रावण महिना

श्रावण महिन्यात नामसप्ताह, मासिक अष्टमी पालखी सोहळा, पारायणे, प्रवचने व कीर्तने इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. वरील सभामंडपात ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, दासबोध, शंकरगीता इत्यादींचे पारायण होते. श्रावणा मध्ये एक दिवस बघून श्री गजानन विजय या ग्रंथाचे पारायण होते. श्रावणात ब्राम्हण भोजन (मेहुण भोजन) देखील संपन्न होते.
 
श्रावण शुद्ध ०९ ते श्रावण वद्य ०१ पर्यंत प्रवचन सप्ताह आयोजित केला जातो.
श्रावण वद्य ०२ ते श्रावण शुद्ध ०८ (कृष्णजन्माष्टमी) पर्यंत नारदीय कीर्तन सप्ताह आयोजित केला जातो व त्याची सांगता जन्माष्टमी दिवशी नारदीय कीर्तनाने संपन्न होतो.
 
श्रावण वद्य ०९ ते श्रावण वद्य १४ पर्यंत संप्रदायिक कीर्तन सप्ताह आयोजित केला जातो.
श्रावण वद्य अमावस्या या दिवशी काल्याच्या कीर्तनाने व महाप्रसादाने श्रावण महिन्याची सांगता होते.

भाद्रपद महिना

या महिन्यात नामसप्ताह, मासिक अष्टमी पालखी सोहळा इत्यादी कार्यक्रम होतात.
तसेच गणेशोत्सव काळात ट्रस्ट तर्फे गणेश याग केला जातो.
 

अश्विन महिना

या महिन्यात नामसप्ताह, मासिक अष्टमी पालखी सोहळा इत्यादी कार्यक्रम होतात.
नवरात्रा मध्ये नवचंडी यज्ञ ट्रस्ट तर्फे संपन्न होतो. तसेच ०९ दिवस गाभाऱ्या मध्ये सप्तशती पाठाचे वाचन गुरुजीं मार्फत केले जाते.
 
दसऱ्या दिवशी पहाटे श्रींची विधिवत पूजा होऊन त्रिकाळ आरती होते. सकाळी शस्त्र पूजन, वाद्य पूजन आदी केले जाते. झेंडू, केळीच्या खुंटांनी संपूर्ण मठ सजविला जातो.
अश्विन शु १५ कोजागिरी पौर्णिमा या दिवशी संध्याकाळी आरती नंतर मसाला दूध व प्रसादाचे वाटप केले जाते.
 
दिवाळी (वसुबारस ते पाडवा)
रोज श्रीना अभ्यंगस्नान घातले जाते व त्रिकाळ आरती होऊन, भक्तांनी आणलेला फराळ स्वीकारला जातो व त्याचा अन्नकोट केला जातो. तसेच पहाटे व रात्री मठात पणत्या, आकाशकंदील लावले जातात. फटाके वाजवले जातात. दिवाळी पहाट कार्यक्रम आयोजित केला जातो. वसुबारस ते दिवाळी पाडवा या दिवसात मठ दिवसभर दर्शनासाठी खुला ठेवण्यात येतो.
 
अश्विन वद्य १२ वसू बारस सायंकाळी दिवशी गाय वासरू यांचे पूजन केले जाते.
अश्विन वद्य १३ धनत्रयोदशी सायंकाळी आरती नंतर धनाची पूजा गाभाऱ्यात केली जाते.
अश्विन वद्य १४ नरक चतुर्दशी गाभाऱ्यातील व सर्व फोटोंना हार घातले जातात व पहाटे
अश्विन वद्य अमावस्या लक्ष्मी पूजन सायंकाळी लक्ष्मी पूजन व खाते वहि पूजन केले जाते.

कार्तिक महिना

कार्तिक शुद्ध ०१ दिवाळी पाडवा या दिवशी झेंडू, केळीचे खुंट आदींनी सजावट केली जाते.
कार्तिक शुद्ध ०८ ही अष्टमी नेहमीच्या दुर्गाष्टमी प्रमाणे साजरी केली जाते. तसेच श्रींचा प्रकटदिन म्हणूनहि साजरी होते. त्यामुळे जास्त गर्दी असते.
कार्तिक शुद्ध ११ विष्णुयाग व विठ्ठल व ज्ञानेश्वर माऊली यांचे फोटोची पूजा केली जाते.
कार्तिक शुद्ध १२ तुलसी विवाह कार्यक्रम मठातील सभामंडपात संपन्न होतो व नंतर शिऱ्याच्या प्रसादाचे वाटप केले जाते.
कार्तिक शुद्ध १५ त्रिपुरारी पौर्णिमा या दिवशी मठात दीपोत्सवाचे आयोजन केले जाते.

मार्गशीर्ष महिना

पंचांग पाहून सप्तमी किंवा अष्टमी पासून गुरुचरित्र पारायण सप्ताहास प्रारंभ होतो. सप्तमी ते चतुर्दशी असा ७ दिवसाचा पारायण सप्ताह होतो. या मध्ये पुरुष गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण करतात तसेच. महिला शंकर गीता, गजानन विजय इत्यादी ग्रंथाचे पारायण करतात. मार्गशीर्ष शुद्ध १५ ला संध्याकाळी आरती नंतर ग्रंथ पूजन करून शिऱ्याच्या प्रसादाने गुरुचरित्र पारायणाची सांगता होते. तसेच मार्गशीर्ष महिन्यात ट्रस्ट तर्फे प्रवचने व कीर्तन आयोजित केले जाते. दत्तयाग केला जातो.
 
दत्तजयंती
सायंकाळी ४:०० ते ६:४० दरम्यान मठातच तीन प्रदक्षिणा करत पालखी सोहळा संपन्न होतो. पालखी दरम्यान पंचागानुसार (०६:०० वाजता) समाधी, पालखीतील पादुका व दत्तमूर्ती वर गुलाल वाहून दत्तजन्म केला जातो. भक्तांना गुलाल लावला जातो व सुंठवड्याचा नैवेद्य दाखवून प्रसाद वाटला जातो. संध्याकाळच्या आरती नंतर भक्तांना साबुदाणा खिचडीच्या प्रसादाचे वाटप केले जाते.

पौष महिना

पौष नवरात्र म्हणजेच – शाकंबरी नवरात्र या काळात ट्रस्ट तर्फे नवचंडी याग केला जातो.
मकर संक्रांत – नाथ संप्रदायाचे नवीन वर्ष म्हणून या दिवशी ध्वजारोहण केले जाते. सौरयाग देखील केला जातो. सर्व देवांना हलव्याचे दागिने घातले जातात.

माघ महिना

माघ शु ०४ गणेश जयंती निमित्त गणेश याग केला जातो.
माघ कृ ०१ गुरुप्रतिपदा या दिवशी गुरुचरित्र या विषयाचे प्रवचन आयोजित केले जाते.
महाशिवरात्री दिवशी मठ दर्शनासाठी दिवसभर उघडा असतो व रात्री ९:०० ते १२:०० या वेळेत नैमित्तिक भजनाचा कार्यक्रम केला जातो. श्रींचे दर्शन गाभारा नेहमीप्रमाणे रात्री १०:३० वाजता बंद केला जातो

फाल्गुन महिना

माघ शु १५ : हुताशनि पौर्णिमा या दिवशी सायंकाळी मठातील मागील पटांगणात होलिका पूजन केले जाते. श्रीनां व होळी साठी पूरण पोळी चा नैवेद्द केला जातो.

पालखी - पादुका मुक्काम

मठामध्ये इतर अनेक संत व देवादिकांचे पालखी सोहोळे, भिक्षाफेरी, पादुका, समर्थ रामदासस्वामींचा प्रचार दौरा परंपरे नुसार विसाव्यासाठी येतात. त्यासाठी अर्ज घेवून पुर्व सूचनेनुसार मठात मुक्कामासाठी परवानगी दिली जाते. पालखी सोबत असलेल्या भक्तांची रहाणे, चहापाणी, भोजन-प्रसाद यांची सोय ट्रस्ट तर्फे मोफत केली जाते. प्रथे प्रमाणे सत्कार, फुलांची सजावट केली जाते व जाताना शिधा दिला जातो.

फुलांची सजावट व रोषणाई

सण, गुरुपोर्णिमा, दुर्गाष्टमी, समाधी सोहळा  अशा प्रसंगी गाभारा, समाधी व सभामंडपात फुलांची विशेष सजावट करण्यात येते. दिवाळीत फुलांच्या सजावटी सोबत पणत्या, आकाशकंदील व विदयुत रोषणाई करण्यात येते. “दिवाळी पहाट” असे संगीत कार्यक्रम आयोजित केले जातात.