दरवर्षी वैशाख शुद्ध प्रतिपदा ते वैशाख शुद्ध नवमी सदगुरु श्री शंकर महाराजांचा समाधी सोहळा साजरा करण्यात येतो. वैशाख शुद्ध प्रतिपदेस पहाटे चार वाजता, चौघड्याच्या निनादात, काकड आरतीने व तद्नंतर श्रींच्या समाधीस अभिषेकाने उत्सवास सुरवात होते. त्यानंतर वीणापूजन करून अखंड नाम सप्ताहास सुरवात होते. समाधी उत्सवात रोज काकड आरती, लघुरुद्र, प्रवचन, कीर्तन, भजन, पारायण इत्यादी अध्यात्मिक व धार्मिक कार्यक्रम संपन्न होतात. उत्सवकाळात श्रींचा मठ व दर्शन रात्रंदिवस अखंड चालू असते. अक्षय्यतृतीयेच्या दिवशी श्रीअन्नपूर्णेचे पूजन करून उत्सवातील महाप्रसाद (बुंदीकळी) तयार करण्यास सुरवात होते. श्रीमहाराजांच्या समाधीदिनी म्हणजेच वैशाख शुद्ध अष्टमीस पहाटे २.३० वाजता श्रींच्या समाधीवर अभिषेकास सुरवात होते. श्रींची आरती पहाटे ५.३० वाजता होऊन महारुद्रास सुरवात होते. महारुद्र संपन्न झाल्यावर महाप्रसादास सुरवात होते जो रात्री उशीरपर्यंत चालू असतो. सायंकाळी ४ वाजता श्रींचा पालखी सोहळा सुरु होतो व सायंकाळी ७.३० वाजता महाआरती संपन्न होते. त्यानंतर मठात श्रीभवानीआईच्या जागरण गोंधळास सुरवात होते. अष्टमीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता प्रक्षाळ पूजा, ध्वजारोहणानंतर काल्याच्या कीर्तनास सुरवात होते. काल्याचे कीर्तनानंतर महाप्रसाद देण्यात येतो. हे सर्व कार्यक्रम संपन्न झाल्यावर उत्सवाची सांगता होते.